भारती विद्यापीठ ‘मातोश्री’ च्या ‘दीक्षारंभ’ला उदंड प्रतिसाद
कडेगाव,( सचिन मोहिते) :
भारती विद्यापीठ, पुणे संचलित मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी “दीक्षारंभ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . नवागत विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण आणि मूल्याधिष्ठित सुरुवात व्हावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. अशा इंडक्शन कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना संस्थेची शैक्षणिक व्यवस्था, मूल्ये आणि विविध संधींची ओळख करून दिली जाते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विवेक रणखांबे होते. तीन दिवसीय दीक्षारंभ समारंभाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व मुख्य वक्त्या म्हणून भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी, अल्ट्रा मॅरेथॉन रनर, प्रेरणादायी वक्त्या आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक कॅप्टन डॉ. पूजा मेहरा यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी डॉ. विकास कुरेकर आणि डॉ. जया कुरेकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

कॅप्टन डॉ. पूजा मेहरा म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत. धाडस, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम आणि जीवनातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची मानसिकता विकसित करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. “यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसून, योग्य दृष्टिकोन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीवर अवलंबून असते,” असे सांगत त्यांनी आपल्या सैनिकी जीवनातील अनुभव, संघर्ष आणि यशस्वी वाटचालीतील अनेक प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्यांच्या ओजस्वी आणि संवादात्मक शैलीमुळे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय परिवारात मनःपूर्वक स्वागत करताना सांगितले की, या महाविद्यालयाची स्थापना डॉ. पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. “महाविद्यालय हे केवळ पदवी मिळविण्याचे केंद्र नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे संस्कारकेंद्र आहे. अभ्यासासोबतच संशोधन, कौशल्य विकास, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, एनएसएस, एनसीसी आणि विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम नागरिक म्हणून उभे राहावे असे आव्हान त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. महेश माळी यांनी केले. कार्यक्रमास शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. शिला मोहिते आणि कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. नंदकुमार मोहिते तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कडेगाव तालुक्यातील विविध अकॅडमीचे समन्वयक आणि त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन कु. रेणुका माळी हिने केले
