मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाचा अनोखा संकल्प; पहा, नेमकं घडलय काय ?
कडेगाव ( सचिन मोहिते) :
भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाचा स्थापना दिन संकल्प दिन म्हणून साजरा करूया, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्रा. डॉ. सौ. मंदा घाटगे यांनी महाविद्यालयात आयोजित स्थापना दिन समारंभ प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे उपस्थित होते.
यावेळी डॉ. घाटगे म्हणाल्या, “दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी डॉ. पतंगराव कदम यांनी 10 मे 1964 रोजी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठ या ज्ञानवृक्षाची एक फांदी कडेगावच्या भूमीत रुजली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृती जपत आणि संस्थापकांच्या लोकोत्तर कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाचा स्थापना दिवस यापुढे ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल. शिक्षण, संस्कार, गुणवत्ता आणि समाजसेवा या मूल्यांचा वारसा जपत संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी नव्या जोमाने कार्य करण्याचा संकल्प या दिवशी करूया.”असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे म्हणाले, आज आपल्या महाविद्यालयाचा स्थापना दिन साजरा करताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगरावजी कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उदात्त ध्येयातून या संस्थेची उभारणी केली. त्यांचा प्रेरणादायी वारसा डॉ. विश्वजीत कदम पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत. सध्याची गरज ओळखून त्यांनी भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सहशिक्षणाची सोय करून साहेबांच्या कार्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव ठेवून आपण सर्वांनी महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून नव्या संकल्पासह यशस्वी वाटचाल करू.
या कार्यक्रमास नॅकचे समन्वयक डॉ. एम. के. माळी, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. नंदकिशोर मोहिते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल उल्का पाटील यांनी केले.
